मदतीला धावा रे …



मदतीला धावा रे …

प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार आहे. हा कोरोना कधी जाईल. कोणाला वाटतं की, मी आता घरात बसुन कंटाळलो आहे. मला घराबाहेर कधी पडता येईल. माझ्या मित्रांना, आप्तेष्ठांना, नातेवाईकांना कधी भेटता येईल. असंच बरंच काही कोणाला काही ना काही वाटत राहिल. पण शेतकऱ्याला चिंता शेतातील मालाची, नाही पिकवला तर विकणार काय ? आणि पोटाला खाणार काय ? त्यामुळे त्याला चिंता शेतातील सोनं उगऊन ते आपल्या सर्वांच्या पोटापर्यंत आणून आपण जेवण करुन तृप्त झाल्याचा ढेकर देण्यापर्यंतची संपूर्ण जबाबादरी त्या‍ बिचाऱ्याची. त्याची परिस्थिती आजही डगमगतीच आहे. अशा परिस्थितीमध्ये सुध्दा तो देशाला जगवतोच आहे. त्याच्यासह शेतमजुर, गोरगरीब, काबाडकष्‍ट करणारांना सुध्दा तो जगवतोच आहे. त्याला दिलासा मात्र आजतागायत मिळालाच नाही. त्याला आधार कोणाचाच नाही आणि आता त्यात हे नवीन संकट. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. प्रत्येकाची दैनंदिन दिनचर्या या व्हायरसने संपूर्णत: बदलून टाकली आहे. गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. शहरातील सर्वच नागरीक आता आपापल्या गावी खेडयाकडे जात आहेत. कोरोना सारखा व्हायरस माणसाचा जीव घेतल्या शिवाय जाणार नाही असं भय प्रत्येकाला वाटत आहे.  तशी स्थिती अनेक देशांची आहे. दिवसेंदिवस या व्हायरसमुळे ग्रासलेले रुग्ण हे वाढत आहेत. असंख्य प्रमाणात जगभरामध्ये यामुळे मृत्यू झालेले आहेत. कृषीप्रधान भारत देशाची सुध्दा हीच अवस्था आहे. मात्र त्यात शेतकरी हा राजा ठरला आहे. कारण तो सर्वांना घरी बसुन तीनवेळचे जेवण त्याने पिकवलेले अन्न अगदी चांगल्या पध्दतीने इथं प्रत्येकालाच तो खाऊ घालत आहेत. देशात असंख्य समाजवेक आहेत. समाजसेवा म्हणजेच इश्वरसेवा असंच ब्रीद पाठीवर घेऊन चालणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना या देशात कार्यरत आहेत. काहीजण वैयक्तिक रित्यासुध्दा मदत करणारे अनेक दानशुर मंडळी भारतात अनेक ठिकाणी सापडतील. देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी ज्यांचे हातावर पोट आहे अशा गोरगरीब, शेतमजुर, कष्टकरी नागरीकांवर आज उभ्या देशात उपासमारीची वेळ आली आहे. परंतू यावर मात करत अनेक समाजसेवकांनी कंबर कसल्याचे दिसून येते. हे पाहून प्रत्येकाच्या डोळयामध्ये एक वेगळंच समाधान पहायला मिळत आहे. अनेक व्यापारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, जेष्ठ मंडळी, नौकरदार, महिला, तरुण मंडळी इतर अन्य व्यक्तीदेखील अशा अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक, अन्नधान्य, राशन व इतर जीवनावश्यक वस्तुंसाठी मदत करत आहेत तसेच या संस्था, व्यक्ती (अवलिये) गोरगरीब, उपासमारीने ग्रासलेले, शेतमजुर, हातावर पोट असणारे रोजंदारी करुन आपला उदरनिर्वाह करणारांना प्रत्यक्ष घरी जाऊन अथवा योग्य त्या मार्गाने मदत करत आहेत. मोठया शहरांमध्ये अन्नछत्र स्वरुपात अनेक ठिकाणी जेवणासाठी पार्सल पुरवले जात आहेत. हे सत्र सुरुच आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकमेकांची प्रेरणा घेऊन प्रत्येकजण होताहोईल तेवढी समाजसेवा करत आहेत. याचे जास्त समाधान वाटते. कारण देशावर जेव्हा जेव्हा असे संकट ओढंवले तेंव्हा तेंव्हा या देशातील असे अवलिये पुढे येऊन अशा संकटांवर मात करण्यासाठी देशसेवेत योगदान देतांना दिसून आलेत. आत्ताही ते पुढाकार घेऊन काम करत आहेत.   ही या देशासाठी अभिमनाची गोष्ट आहे. पोलीस बांधव, डॉक्टर्स, नर्स, इतर कर्मचारी हे आपल्यासंर्वांसाठी बाहेर कोरोनशी लढा देत आहेत. आपल्याला फक्त घरात बसुन सहकार्य करायचे आहे जेणेकरुन कोरोनावर मात करता येईल. शेतकऱ्यांना जर आजतागायत एरवी विविध स्तरातून अशाच प्रकारची शेती सुधारणेसाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजना झाल्या असत्या, वेळोवेळी मदत मिळाली असती तर अनेक शेतऱ्यांची जीव वाचले असते. अनेक आत्महत्या थांबल्या असत्या. तर आज बऱ्याच ठिकाणी महागाई कमी होण्यासाठी व उपासमारीसाठी गोरगरीबांना भटकंती करावी लागली नसती असं मला वाटतं. असं माझं वैयक्तिक मत आहे. वैचारिक मतदभेद असू शकतात पण माझं वैचारिक मत हे जनहित आहे हे मात्र मान्य करावे लागेल. मदत करणं हा प्रत्येकाचा सामाजिक गुण आहे. ते प्रत्येकाचं सामाजिक अंग आहे. तो एक चांगला दृष्टीकोन आहे. पूर्वजांनी आपल्याला जे संस्कार  केले आहेत. त्यामुळे आज समाजसेवेचे महत्व सर्वांना वाटत आहे आणि हे महाराष्ट्रासाठी कौतुकाची गोष्ट आहे. येथील जनता ही नेहमीच दारावर आलेल्या तसेच इतर गरजुंना सढळ हातानेच मदत करतेच. गोरगरीब जनता सुध्दा नेहमीच कोणाला उपाशी ठेवत नाही. पण आज त्यांच्यावरच अशी उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांना सर्वांच्या मदतीची गरज आहे. म्हणून होता होईल तेवढे सर्वांनी मिळून त्यांच्या मदतीला धावा रे असंच मी म्हणेन.

-         शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..