घोटाळ्यांचा देश …


घोटाळ्यांचा देश …

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, याच कृषीप्रधान देशाची ओळख आता घोटाळ्यांचा देश म्हणून होत आहे. त्याचं असंय की, या देशात सर्वात जास्त प्रमाणात घोटाळे हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीपासून सुरु होते व राजकीय वर्तुळात गोल गोल फिरु लागते. असंच समीकरण या देशात गेल्या सत्तरहून अधिक वर्षांपासून घडत आहे. या देशातील सुजाण जनता चुकीच्या व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तसेच या देशात घरणेशाहीचे राजकारण मोठया प्रमाणात आहे. याच घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब श्रीमंतीच्या मधले अंतर हे जास्त वाढत चालले आहे. इथं प्रत्येकाला राजकारणात नाव नाही तर बक्कळ पैसा व गडगंज संपत्ती कमावण्यासाठी यायचं असतं. राजकारणाचा दुसरा अर्थच जणू घोटाळा. समाजकारणाच्या नावाखाली लागलेला हा कलंकच म्हणावा लागेल. पैशांशिवाय निवडणुका जिंकताच येत नाहीत. हे वाक्य इथल्या प्रत्येक राजकारण्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं व दृढ झालेलं आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे पैसा दुपटी तिपटीने याच घरात वाढतो, त्यानंतर हळूहळू घोटाळयात सामील असलेले कार्यकर्ते यांची घरं भरली जातात. तसेच गुत्तेदार, पोसलेले गुंड, इतर शासकीय कमीशन खाणारे दलाल यांच्याकडे मात्र सत्तेच्या काळात गडगंज पैसा उभा राहतो, घरच्या तिजोऱ्या कचाकच भरतात. कधीकाळी सायकलवर फिरणारे एक दोन वर्षातच फॉर्च्युनच्या ताफ्यातून भरधाव नजरेआड होतांना दिसतात. हे सर्व केव्हा होतं ? अचानक ? सर्व परिस्थीती केव्हा बदलते ? अचानक कसा काय कायापालट होतो ? हे मात्र आत्तापर्यंतचं विश्लेषण न होणारं कोडंच बनून राहिलं आहे. 

सरपंचंपासून ते  मंत्र्यांपर्यंतच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या खाऊ वृत्तीमुळे देशातील सर्वसामान्य मजुर, शेतकरी, मध्यमवर्गीय हाल सोसताहेत. देशाची प्रगती याच घोटाळेबाज व खाऊ वृत्तींमुळे आज तटस्थ आहे. शासकीय पदावर काम करणाऱ्या शिपायांपासून ते वर्ग एक च्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वसामांन्यांची कामं अनेकजण पैसे घेतल्याशिवाय करत नाहीत, त्याला आपण लाच म्हणतो. एवढंच नव्हे तर अनाधिकृत कामं करण्याच्या परवानग्यांसाठी अमाप पैशांचा गैरव्यवहार यांच्यामार्फत चालतो. याचा त्रास सर्वसामान्यान जनतेला होतो. शेतकरी सोडला तर या देशात प्रत्येकजण घोटाळे करतोय. आज देशावर आलेलं संकट कितीही मोठं असलं तरी त्याला सोसण्याएवढी ताकद शेतकऱ्यांकडं आहे. शिवाय यापेक्षाही मोठं संकट भविष्यात आलं तर त्याचा सामना मोठया प्रमाणात शेतकरी वर्गच करताना दिसेल. हे वाक्य कुठं तरी लिहून ठेवा. देशातील राजकारण हे जोपर्यंत घोटाळेमुक्त होत नाही. तोपर्यंत निर्दोषांच्या बळींची संख्या वाढणारच. आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी खुप मोठी यंत्रणा यापुढे उभी करावी लागेल. हा देशासाठी मुख्य अभ्यासाचा व विचार करायला लावणारा विषय आहे. देशाच्या सिमेवर उन, वारा, पावसाची तमा न बाळगता आपल्या देशाचा जवान उभा आहे. ती व्यवस्था सिमेवर आपल्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळं आज आपण घरात सुखाचा घास खाऊ शकतो. तसेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स यांच्यामुळे आपण आज घरात सुखरुप आहोत. शेतकरी, जवान, डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाईगार, शिपाई व इतर संबंधीत देशसेवक आज संपूर्ण देशासाठी लढाई करत आहेत. का ? तर आपण सर्वजण घरात सुखरुप रहावं म्हणून. देशात घोटाळेबाज वृत्तींच्या अवकाळी व खाऊ वृत्तीच्या मानसिकता असणाऱ्यांमुळे देश अधोगतीकडे चालला आहे. लाच घेणे व देणे या दोन्ही गोष्टी कायद्यानं गुन्हा आहेत. तरी सुध्दा पैशांशिवाय शासकीय कार्यलयात कामं होतील तर शप्पथ. 

देशाची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येपैकी इतर देशांच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, यापुढे जनगनणा झाली तर कदाचित पहिला सुध्दा क्रमांक आपल्या देशाचा येईल. पैसा कमावण्यासाठी मागचा पुढचा कसलाही विचार न करता, कोणत्याही मार्गाने पैसा कमावण्याचा हेतू ठेवायचा व निष्पापांच्या मनाशी, भावनेशी, जीवाशी खेळ खेळायचा. असं वागण्यासाठी जगाच्या पाठीवर कोणताच धर्म असं करायला शिकवतो का ? राज्यातील मंत्रीमंडळाचे तर कित्येक घोटाळे उघड झाले आहेत. जे उघड झाले ते सर्वांना परिचित आहेत. पण जे उघडच नाही झाले त्याचं काय ? याच कारणामुळे देश मागे पडतोय. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत नाही. घोटाळयांच्या बरोबरच कर्जबुडव्यांचं तर विचारुच नका. बँकाकडून कंपन्यांच्या माध्यमातून अमाप पैसा कर्जम्हणून घ्यायचा व तो लुटायचा, परदेशात जाऊन ऐश करायची, हा बऱ्याच ऐतखाऊ लोकांचा धंदा आहे. कष्ट, मेहनत करायची नाही, मग आहेच देशाच्या तिजोरीवर ताण.  अशा प्रकारांमुळेच शेतीसुधारणेसाठी मुबलक पैसा, सोयीसुविधा, योजना राबवतांना अनेक शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. आज रोगराईने जेवढे मेलेत त्यापेक्षा कितीतरी पटीने आजवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यांना नसेल का वाटलं कधी ऐश आरामात आपली पोरं बाळं रहावी, आपणही कधी ऐशोआरामात जीवन घालवावे. नेहमीच त्याच्या वटयाला कष्ट. पण कष्टाचेच भांडवल करुन तो आजवर आपल्यासर्वांना सुखाचा निवाला आपल्या पोटात ढकलातोय. वर्षानुवर्षे शेतकरी बेंबीच्या देठापासून टाहो फोडून ओरडतोय की, माझ्या शेतमालाला भाव द्या ! पण, असं होतच नाही. या समस्येवर होतं ते फक्त दुर्लक्ष व राजकारण. 

आजच्या तरुणाईला स्मार्टफोन नावाचं खोकडं हातात व डोळयात घालून फिरण्याचा रोग जडलाय. त्यांना त्यातुन वेळ मिळालातर बरे होईल. उद्याचा भारत असलेल्या या स्तंभांकडे आधार म्हणून पाहिलं जातं. ही तरुणाई बेधुंद नशेत भरधाव गाडया चालवण्याच्या नादात देश कुठे चाललाय हे विसरुन गेली आहे. तरुणाईने मनावर घेतले तर देश आज कोणत्याही परिस्थतीत असेल भविष्यात नक्कीच प्रगतीपथावर नेऊ शकतो. अशी तरुणाईकडून आशा ठेऊ शकतो.

- शंकर शेषेराव चव्हाण, अंबाजोगाई (संपर्क : 9921042422)

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..