नेहमीच पोलीसांना का दोष द्यायचा ?


कायदा व सुव्यवस्था जपणारं खातं, जनतेच्या सरंक्षणाची जबाबदारी असणारं खातं, उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगतां दिवसाचे चोवीस तास जनतेच्या सेवेत तत्पर असणारं पोलीस खातं, सण वार विसरुन कर्तव्यदक्षतेचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस खातं. देश म्हणजे आपण व आपली सेवा व संरक्षण करण्याचं पुण्यकर्म पोलीस विभागाकडे सोपलं आहे. पोलीस शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत खाकी वर्दी दिली आहे ज्या वर्दीमध्ये ‘सत्य’ व गुन्हेगाराला ‘थरकाप’ उडेल अशी शक्ती आहे व त्यापेक्षाही शक्ती ही आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये एक असामान्य ताकद आहे. पण हल्ली जनतेच्या वर्दीला सर्दी झालेली दिसते. खून, चोऱ्या, बलात्कार, आत्महत्या, मोर्चे, संप, सांस्कृतिक, धार्मिक, राजकिय कार्यक्रमांचा बंदोबस्त ही सर्व कामे पोलीसांवर सोपवलेली आहेत. त्यासाठी रात्री बेरात्री देशसेवा करणारा जवान आज बोटावर मोजणाऱ्या पोलीस खात्यातीलच काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे बदनाम होत आला आहे. लाच घेणे, पिळवणूक करणे, खोटे गुन्हे दाखल करण्यात मदत करणे, विनाकारण दबाव आणून खंडणीस्वरुपात पैशांची मागणी करणे, राजकिय लोकांच्या पुढे गोंडा घोळून त्यांच्या मनमानीप्रमाणे वागून त्यांच्या तुटपूंजा पैशांपोटी ताटाखालचं मांजर होणे अशा विविध विकृतींचा स्विकार करुन कर्तव्यदक्ष या शब्दालाही लाज वाटेल अशी कृत्य करत असतात व आजही करत आहेत. असो ! पण यांच्यामुळे सर्वच पोलीस खातं आजही बदनाम आहे. पण जसं पाच बोटे सारखी नसतात तसं सर्वच पोलीस सारखे नसतात हे कुठंतरी आपण विसरत चाललो आहोत. ते सुध्दा आपल्या सर्वांसारखे एक माणूसच आहेत हे ही आपण विसरत चाललो आहोत. पोलीसांनाही कुटूंब, मुलं बाळं आहे, त्यांनाही सण, उत्सव, संसार आहेच की ! पण नौकरी करत असतांना कुठंतरी या सर्व गोष्टींना बाजूला सारुन शांतता भंग होऊ नये, रात्रीची झोप जनतेला नीट लागवी यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीसांवर आजून कधीपर्यंत आपण त्यांच्या नावाने विनाकारण खडे फोडणार ? सांगा की ? गुन्हा कोण करतं ?, खुण, चोऱ्या, बलात्कार, हल्ले, हाणामाऱ्या इत्यादी गुन्हे ही सर्वसामान्य जनतेतूनच गुन्हेगार बनत असतो. जेव्हा एखादा गुन्हा घडतो. तो दाबण्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला गुन्हा केल्यामुळे होणाऱ्या शिक्षेपासून वाचवण्याचा आपण प्रयत्न कोणत्या कोणत्या पध्दतीने करतो हे पोलीसांना व सर्वांना माहित आहेच की ! एखादे प्रकरण गुन्हा नोंद होण्याच्या आत कशी माघार घ्यायची, कशा पध्दतीनं मांडवली करायची हया सर्व गोष्टी करण्यासाठी आपणच पूर्णत: जबाबदार आहोत असं नाही का वाटत कधी ? गुन्हा दाखल होण्याअगोदार मांडवली करण्यासाठी धडपडणारे आपण व पोलीसांना पैशांच्या बंडलावर नाचवणारे आपणच ! मग यात त्यांचा काय दोष ! पैशासाठी तर प्रत्येकजण मिळेल त्या मार्गाचा अवलंब करतो. या जगात सांगा कोण बरं आहे का की त्यानं तीळाएवढाही भ्रष्टाचार केला नाही किंवा लाच घेतली नाही वा दिली नाही. मुलाला शाळेत शिक्षणासाठी प्रवेश मिळावा या हेतूने जी अधिकची रक्कम डोनेशन स्वरुपात दिली जाते त्याला लाच नाही तर काय म्हणतात ? एवढेच नव्हे तर वाहतुक पोलीसांना वाहन सोडून देण्यासाठी अमुक अमुक रक्कम घ्या किंवा तुमचं काय असेल ते घ्या साहेब व जाऊ दया ! असं सांगून चिरीमिरी देऊन कायदा न पाळता, शिस्त न पाळता, लाच आपणच देऊन, वाहतुकीचा एकही नियम न पाळता दादागिरी करणारे आपणच की ? व पोलीसांच्या नावाने खडेही फोडणारे आपणच. कायदयाचे धिंडवडे काढून खतपाणी घालणारे आपणच या सर्व गोष्टी कुठं तरी थांबल्या पाहिजेत. लाच देणारा व लाच घेणारा हे दोघेही समान कायद्याच्या दृष्टीने तेवढयाच प्रमाणात गुन्हेगार असतात. लाच देणं व लाच घेणं हा गुन्हा आहे हे माहित असतांना सुध्दा स्वत:च्या स्वर्थासाठी आपण कायदा खिशात घेऊ पाहतो किंवा कायदयाला आव्हान करुन कयदा मोडतो हे तितकंच खरं आहे. पैशांच्या जोरावर गोरगरीबांवर होणारा अन्यायही दिसत नाही व समाजसवेची धूर्त चादर ओढून गावभर दवंडी पिठवणारे कायद्याच्या रक्षकांनाच विकत घेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा जेंव्हा कुठेही गुन्हा किंवा कायदा मोडण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याला तिथंच धडा शिकवा, जर आपण चुक केली असेल तर नियमानुसार दंड भरा, जर एखादा पोलीस कर्मचारी विनाकारण त्रास देत असेल व पैशांची मागणी करत असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करा. देशात वाहणांची संख्या जेवढया पटीने वाढत आहे तेवढयाच पटीने अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. दररोज वृत्तपत्र उघडले कि अपघाताबाबत वृत्त नाही असे कधी होतच नाही. हेल्मेट न वापणरे, वाहनांचा अतिवेग, दुचाकीवर दोन पेक्षा जास्ती व्यक्तींचा प्रवास, प्रवाशी वाहनांमध्ये अधिकचे प्रवाशी बसवुन पोलीसांना किंवा आर.टी.ओं. विभागाला वाहतुकीचे नियम तोडुन हुलकावण्या दिल्यानेच आपघात होतात. तेंव्हा वाहतुक पोलीस येत नाहीत जनतेचा अपघात करायला हे ही लक्षात असू दया. एखादी घटना घडत असेल तर दोन्ही बाजूचा तेंवढाच तंतोतंत विचार विनिमय करायला हवा हे सुध्दा तेवढंच महत्वाचं. वाहतुकीचे नियम पाळल्यास वाहतुक पोलीस कशाला हवेत प्रत्येक ठिकाणी. असे नाही कि वाहतूक पोलीस जागोजागी नसतात ! पण वाहतुकीचे नियमच जराही पाळले नाहीत तर अपघात हे होणारच. कोणीही कशाही प्रकारे वाहन चालवेल अपघात करेल आणि मग अपघात झाल्यास त्याला वाहतुक पोलीस कसा काय जबादार होऊ शकतो. हे सर्व कुठंतरी जनतेच्या वतीने सुध्दा बदलायला हवं व हे स्विकरलंच पाहिजे. मी म्हणत नाही की सर्व चुका जनतेच्याच. पोलीसांच्याही चुका असतील. त्या त्यांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. कायदा, नियम पाळले तर कशाला कोण तुम्हाला विनाकारण लाच मागेल, पैशांची मागणी करेल, विनाकारण त्रास देईल. वाहन परवाना नसणारे पोलीसांना हुलकवण्या देऊन गल्ली बोळामधून वाहने नेऊन कसं चुकवं म्हणून खिदीखिदी दात काढून आरेडणाऱ्यांचे वागणे आपण नक्कीच पाहिले असेल. त्यात आजकालचे पालक अठरा वर्षाखालील बडे बाप की बिगडी हुई औलादींना स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने देतात त्यांच्याकडं परवाना असतो ना त्यांना वाहतुकीचे नियम माहित असतात. ज्या ठिकाणी चाळीसच्या गतीने जाण्यास सांगितले त्या ठिकाणी हा पठ्ठया शंभरपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवतो आणि मग काय जोश में आके होश खो बैठता है ! अरे बापांनो हे थांबवा आता ! पुरे झाले लाड तुमच्या युवराजांचे ! बिघडलेल्या सुपुत्रांमुळे एखाद्याचा जीव गेल्यास पुन्हा नका पोलीसांना दोष देऊ. आणि अशी बरेच उदाहरणं आहेत की अशा प्रकारची अपघात झाले व कित्येक निर्दोषांना आपला जीव गमवावा लागला आहे. कायदा हा आपल्यासाठीच आहे, पोलीस हे आपलेच बांधव आहेत, नियम पाळणे मग ते कोणतेही असोत हे परम कर्तव्य मानले पाहिजे. पोलीसांनीही कायदयाच्या चौकटीतच राहुन काम केले पाहिजे. बऱ्याच वेळेस पोलीसांच्या चुका नसतांना सुध्दा पोलीस प्रशासन विनाकारण होणाऱ्या बदनामीला बळी पडतात व काही इतर विकृत विचारांच्या लोकांमुळे बदनाम होतात हे पहावलं नाही म्हणुन हा शब्द प्रपंच.  

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..