कोणी मत देता का मत ?


कोणी मत देता का मत ?
भारत असा एकमेव देश आहे जिथं नको त्या गोष्टीला महत्वं दिलं जातं आणि ज्या गोष्टीची खरी गरज आहे त्या गोष्टीपासून सर्वसामान्य जनतेला व लाभधारकाला वंचित ठेवलं जातं. पण याला सुध्दा आपण सर्वच जण तेवढेच जबादार आहोत जेवढी आपल्या देशाची राजकिय व्यवस्था. राजकिय व्यक्तींचा उधो उध्दो करणारे आपणच आणि त्यांच्या नावाने बोटं मोडून नको त्या शिव्या घालून सर्व एकाच माळेचे मणी असंही बोलणारे आपणच. ही व्यवस्था बदलेल पण याला बराच अवधी बाकी आहे आणि हे बदल घडवणे या देशातील तरुणाईमध्ये नक्कीच आहे असा माझा दृढ विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने सध्या तरी सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे. जिथं तिथं एकच चर्चा की कोण निवडुण येणार आणि कोणाला घरचा रस्ता धरावा लागणार. हा विषय थोडा नाजुकच आहे. कारण सबंध महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा बिगुला वाजला असून देश विदेशातही या निवडणुकांवरुन चर्चेला उधान आल्याचं चित्र दिसून येतं. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे, ताकदीप्रमाणे निवडुकीमध्ये धडपडक करत आहे व निवडणुन येण्याची स्वप्नं पहात आहे. महत्वाचं म्हणजे राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणाचं एक वेगळं समिकरण आहे. जनता ही आपल्या जीवनावश्यक गरजांसोबत इतर आवश्यक गरजा, सुख सोई, सुविधा मिळाव्यात यासाठी निवडणुकांच्या माध्यमातून चांगला व कार्यक्षम उमेदवार निवडुन देण्याचं कर्तव्य बजावत असते. निवडणुकपूर्व व पश्चात मतं मागणाऱ्या उमेदवाराच्या सिनेमाचा रोल सुरूवातीपासून शेवटपर्यंत कसा बदलत जातो ही बाब काही या देशातील जनतेला नवीन नाही. परंतू त्यातल्या त्यात आश्वासन दिलेल्या उमेदवाराने अर्धेनिम्मे आश्वासनं जर पूर्ण केली असतील आणि काहीच न करणाऱ्यापेक्षा जर थोडेफार लाटून चाटून राहिलेलं जनतेला दिलं असेल तर जनतेचेही सौख्‍ समाधान त्यात सामावलेले असते. एवढयावरच समाधान. काही मतदारांनी पैसा घेऊन मतं विकलेली असतात. काही मतदारांनी आपल्या म्होरक्यानं सांगितलं म्हणून, काही मतदारांनी आपल्या जातीचा आहे म्हणून, काही जणांनी आपल्याला टेंडर व इतर आर्थिक सोर्स उपलब्ध करुन दिले म्हणून, तर काहींनी त्या उमेदवाराकडे पैसा-अडका, संपत्ती जास्त आहे म्हणून इत्यादी इत्यादी दान करावयाची गोष्ट अशा प्रकारात दिलेली असते. पण शंभरातील एक टक्के उमेदवार असेही असतात की ज्यांनी उमेदवार खरंच त्या पदासाठी पात्र आहे यामुळे कर्तव्यदक्ष मतदाराप्रमाणे मत दिलेलं असतं. मात्र या एक टक्के मतदारांचा फारसा काही उपयोग होत नाही. पुन्हा पाच वर्ष टिकास्त्रे, मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, मागण्या इ. प्रकारची फळं भोगावी लागतात. आता राजकिय वातावरण तर योग्य विचार करण्यासारखंच आहे. मुळ मुद्दा फक्त एवढाच आहे की, उमेदवार हे मतं मागण्यासाठी आपल्या दारोदार येतील, ज्या आजीबाईला संस्थेच्या कार्यालयाच्या कामासाठी अनेक खेटे खायला लावणारे तेच उमेदवार आज त्यांच्या पुढं साष्टांग दंडवत घालतील, रात्री बेरात्री नोटांची बंडले घेऊन प्रत्येक मताची किंमत ठरवुन घरातल्या प्रौढ व्यक्तीकडून ठरवून ओठसवर खडीसाखर व डोक्यावर बर्फ ठेल्यागत उमेदवाराची बोली भाषा असेल. वगैरे वगैरे निवडणुकांपूर्व चालायचंच. पण सुजान जनतेला एकच विनंती आहे की, ज्या वेळेस उमेदवार मत मागण्यासाठी आपल्या उंबरठयावर येईल त्यावेळेस कर्तव्यदक्ष, व जबाबदार व्यक्ती कसा असतो याची नक्कीच जाणीव करुन दया. समस्यांची यादी त्याच्या हातावर ठेवा. दिलेल्या आश्वासनांचं काय झालं म्हणून जाब विचारा, रस्त्यांबाबत, स्वच्छेतेबाबत, अरोग्य, मुबलक पाणीपुरवठा, तुम्हाला जाणवलेल्या समस्या, इत्यादी समस्यांवरुन झालेला तुमच्या कुटूंबियांना त्रास याचा नक्की विचार करा व त्या उमेदवाराला थोडसं खडसावण्याचं धाडस यंदा कराच. कुठं तरी लोकशाही जीवंत असल्याची जाणीव स्वत:ला व उमेदवारालाही होऊ दयाच आणि महत्वाची आणि कळकळीची विनंती आपलं अमूल्य मत विकण्याचा प्रयत्न अजिबात करु नका. कारण पैसा वाटप करणाऱ्या उमेदवाराजवळील रक्कम ही घाम गाळून, कष्ट करुन, मजुरी करुन आणलेली रक्कम नसुन हा चुकीच्या मार्गाने कमावलेला व भ्रष्टाचार करुन, घोटाळे करुन हा जनतेचा म्हणजे आपलाच पैसा असेल. तुम्ही जेवढया प्रमाणात पैसा घ्याल त्याच्या दुप्पट, तिप्पट पैसा निवडुन आपल्यास नक्कीच आपल्याकडून वसूल होईल हे मात्र नक्की. सुजान जनतेला हीच एक भली मोठी सुवर्ण संधी आहे. योग्य उमेदवार निवडुन देऊन आपल्या शहराचा, गावाचा, राष्ट्राचा विकास होण्यास हातभार लावयची व खरंच वेळ आहे भ्रष्ट व निष्क्रिय उमदेवाराला त्याची जागा दाखवायची. तेव्हाच उमेदवार नक्कीच म्हणेल, कोणी मत देता का मत !

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422
hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..