नौकऱ्यांसाठी तरुणांची फसवणूक !


नौकऱ्यांसाठी तरुणांची फसवणूक !
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुण वर्ग हा एखादी नौकरी आपल्याला मिळावी हेतूने धडपडत असतो. तांत्रिक, विज्ञान, व्यवस्थापन, वैद्यकिय किंवा वाणिज्य पदवी शिक्षण घेणाऱ्या तरुणांची महाविद्यालयात खाजगी कंपन्यांमार्फत कॅम्पस इंटरव्हयूद्वारे (मुलाखतीद्वारे) निवड होते. मात्र इतर तरुणांना स्वत:हून नौकरीचा शोध घ्यावा लागतो. चांगली नौकरी मार्गदर्शनाशिवाय शोधणे अत्यंत कठीण काम असते व तरुणांना त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. नौकऱ्या मिळवण्यासाठी सहाय्य करणारे स्पर्धेच्या विज्ञान युगात अनेक विविध माध्यमं, सेवा देणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. पैकी सल्ला केंद्र (कन्सल्टंसी) हे प्रभावी माध्यम ठरत आहे. या नौकरी सल्ला केंद्रांमार्फत तरुणांची माहिती रिक्त पद असणाऱ्या कंपन्यांना पुरवली जाते. कंपनीकडून अथवा तरुणांकडून काही प्रमाणात सेव शुल्कही आकारले जाते. त्यानंतर तरुणांना नौकरी हव्या असणाऱ्या पदावर नौकरी मिळते. पण या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. अशा प्रकारची सेवा देण्यासाठी इतर अशी बरीच माध्यमं कार्यरत आहेत. म्हणून विज्ञान युगात डिजीटल प्रणालीचा वापर करुन इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संकेतस्थळांचा (वेबसाईट) आधार घेतला जातो. त्यामुळे उमेदवाराची माहिती कंपनीला, संबंधीत संस्थांना सहज उपलब्ध होते व याप्रणालीद्वारे नौकरी मिळवण्यासाठीची कार्यवाही अत्यंत जलद गतीने होते. ही देशासाठी कौतुकास्पद बाब आहे. पण हल्ली याबाबत चित्र काही वेगळंच आहे. पैसा मिळवण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा दुरूपयोग करुन तरुणांना फसवण्याचा डाव रचणाऱ्या मोठमोठया शहरांमध्ये बऱ्याच कंपन्या, सल्ला केंद्र, संस्था आहेत. तरुणांना नौकरी लावतो या बहाण्याने लुटण्याचं काम दिवसा ढवळया केलं जात आहे. ते म्हणजे एखादया उमेदवाराने त्याला नौकीसाठी कोठेही नोंद केलेली नसतांना त्या उमेदवाराचा पत्ता, फोन नंबर कोठून तरी शोधून काढून त्याला त्याच्या पत्यावर बनावट नौकरी मिळाल्याचे दस्ताऐवज पाठवले जातात व अमुक अमुक रक्कम खात्यावर सुरक्षा रक्कम म्हणुन जमा करा व आपल्याला अमुक अमुक ठिकाणी रुजू करण्यात येईल असे सांगितले जाते. भारतामध्ये मोठमोठया उदयोजकांच्या बऱ्याच मोठया नामांकित कंपन्या आहेत. त्यांच्या नावाचाही बऱ्याचदा दुरूपयोग करुन त्यांच्या ओळख चिन्हे वापरुनही रंगित बनावट कागदपत्रे तयार केले जातात. जेणे करुन कोणालाही याबाबत शंका येऊ नये व ही कागदपत्रे खरी व सत्य आहेत अशी वाटावी अशा प्रकारची बनवलेली असतात. आपल्याला नौकरी लागणार म्हटल्यावर तरुणांच्या घरचं वातावरण आनंदमय होऊन जातं व वीस पंचवीस हजाराला कुठं पहावं ! असं म्हणून ती रक्कम त्यात नमूद केलेल्या विशिष्ठ खात्यात जमा केली जाते. व त्यानंतर त्या फसव्या अनोळखी व्यक्तीचा फोन येतो व आणखी अमुक अमुक एवढी रक्कम अमुक अमुख खात्यात भरा व अमुक दिवशी तुम्हाला कॉल लेटर मिळेल. दहा ते पंधरा दिवसानंतर ना पत्र मिळत नाही किंवा त्या फसव्या  व्यक्तीचा फोन येत नाही किंवा लागतही नाही. अशा प्रकारे सरळ सरळ फसवणूक होते. दुसरी बाब म्हणजे इंटरनेटच्या जमान्यात नौकऱ्या मिळवून देणाऱ्या लाखो वेबसाईट, कन्सल्टंसी सर्व्हिसेस, कंपन्या अशा प्रकारची सेवा पुरवणाऱ्या संस्था आहेत. परंतू नौकरी मिळवण्यासाठी यांचा सेवा शुल्क त्यांना देणे बंधनकारक असते. चूकून त्यांचे सेवा शुल्क खात्यात भरलेच तर लगेच थोडया वेळाने त्यांचा ईमेल, फोन, संदेश येतो की आपले सलेक्शन झाले आहे पुन्हा इतर काही कारणास्तव किंवा सुरक्षा ठेव म्हणून अमुक अमुक रक्कम (ही रक्कम पहिल्या रक्कमेपेक्षा जास्त असते) खात्यात भरा. उमेदवाराने पहिली रक्कम भरुन अडकल्याने त्याच्याजवळ पर्यायच उरत नाही व विश्वास ठेवावा किंवा नाही या संभ्रमात तो पडतो. याबाबत अचूक मार्गदर्शन करणारंही कोणी नसतं त्यामुळे हळूहळू तो यामधे गुंतत जाऊन फसव्यांना बळी पडतो. एवढेच नव्हे तर अनेकदा फसवे ईमेल, लॉटरी लागल्याचे संदेश मोबाईलवर येतात त्यालाही आजपर्यंत अनेकजण बळी पडलेले आहेत. बरीच उदाहणं सापडतील. एटीएम कार्डचे नंबर विचारुन परस्पर पैसे काढून घेणाऱ्या अनेक टोळींचा पोलीसांनी पर्दाफाश केल्याचेही वृत्त आपण या पूर्वी पाहिले आहे, वाचले आहे. पण हे सत्र काही न थांबणारे आहे. तरुणांना एक विनंती ही कोणत्याही गोष्टीची हमी घेतल्याशिवाय, खातरजमा केल्याशिवाय कोणी नौकरीसाठी पैसे भरण्यासाठी जबरदस्ती करत असेल किंवा कितीही पटवून सांगत असेल तर खात्री केल्याशिवाय, तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कंपनी, संस्था, सल्ला केंद्रामध्ये रक्कम जमा करु नका. अनेक वृत्तापत्रांमध्ये, ईमेल, मोबाईवर एस.एम.एस. येतो की घरबसल्या पंचेवीस हजार ते तीस हजार कमवा, घराच्या छतावर टॉवर बसवा, एस.एम.एस. पाठवण्याचा जॉब, परंतू अशा प्रकारचे काम मिळवण्यासाठी फोन केला असता अगोदर पैशांची मागणी केली जाते व त्यानंतर फसवले जाते. अशा भूलथापांना बळी पडू नका व तज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. आपले पालक रात्रं दिवस मेहनत करुन आपल्यासाठी एक एक पैसा जमा करतात त्याचा नक्कीच विचार करा व आपल्याला फसवणारांपेक्षाही स्मार्ट बना. एवढया मोठया रक्कमा भरुन कोणी नौकऱ्या देत नसतं आणि तेही खाजगी. नौकरी मिळाल्यानंतर मेहनत आपण करायची व त्यामोबदल्यात पैसा कमवायचा ही रित असतांना पैसे देऊन नौकरी मिळवणं हे जरा चूकच वाटत आहे. मर्यादीत रक्कम नौकरी लावून देणाऱ्या सल्ला केंद्र किंवा संबंधीत कंपनीला दयायला हरकत नाही. सर्वच फसवे असतात असे नाही. पण खात्री केल्याशिवाय अनोळखींवर विश्वास ठेवणे अयोग्यच.

शंकर चव्हाण अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल : 9921042422, hr.shankarchavan@gmail.com

Comments

दर्जेदार साहित्य वाचा :

साहेब ! मी शेतकरी बोलतोय …

आई माझी मायेचा सागर …

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हरवत चाललाय !

लेडीज फस्ट मग ‘आई शेवटी का जेवते’ ?

चालक, वाहक व प्रवाशांसाठी थोडसं !

राहुल जोगदंडची “यशोगाथा” आनंदगाव ते दुबई जीवनप्रवास

'यशाला' शॉर्टकट नाहीच !

आदर्श पत्रकार वसंत मुंडे यांची यशोगाथा

मैत्री पुस्तकांशी

लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे …..